2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी कधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. मे महिन्यात उत्तर प्रदेश सरकारचा कार्यकाळ समाप्त होतो आहे. तर गोवा सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी अखेरीस संपुष्टात येतो आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाबसह उत्तराखंड आणि मणिपुरातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय वातावरण तापू लागलंय. पाचही राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार, यात शंका नाही.