एस.टी कामगारांच्या एकूण 22 संघटनांच्या कृती समितीन शरद पवारांसोबत बैठक घेतली. अनिल परबही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना कामावर तत्काळ रुजू होण्याचं आवाहन केलं. प्रतिनिधींचं बोलून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये काही लोकांनी गैरसमज पसरवल्यामुळे हा संप इतका लांबला गेला, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान एस.टी कर्मचाऱ्यांबाबत आज सरकार इतक सकारात्मक का झालं, यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी म्हटलंय, की संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा प्रवाशांचाही विचार करावा. एसटी संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पण काहींनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला. सरकार एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाही, असा गैरसमज पसरवला गेला. मला इथं राजकारण करायचं नाही. मला प्रश्न सोडवायचं आहे. ज्यांना राजकारण करायचं, त्यांनी राजकारण करावं, माझ्या हा प्रश्न सुटणं जास्त महत्त्वाचं आहे. काहींना याबाबत गैरसमज पसरवले आहेत. मात्र ज्यांनी दिशाभूल केली त्यामुळेच हा संप चिघळला गेला, असंही शरद पवार यांनी म्हटलंय.