Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले…
राज्यातील खरीप हंगाम, पेरणीची स्थिती आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात आतापर्यंत 84 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याचं सांगत, शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, बियाण्यांबाबत अनियमितता आढळलेल्या 85 कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील खरीप हंगाम, पेरणीची स्थिती आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात आतापर्यंत 84 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याचं सांगत, शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, बियाण्यांबाबत अनियमितता आढळलेल्या 85 कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
माध्यमांशी संवाद साधताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना जेवढं सहकार्य आणि मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न सुरू असून, खतांचा कोणताही तुटवडा नसल्याने शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही. काही भागात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नसला, तरी पुढील काळात राज्यभर चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
यंदाच्या खरीप हंगामात मका आणि सूर्यफूल या पिकांची सर्वाधिक पेरणी झाल्याची माहिती देत त्यांनी सांगितलं की, राज्यात आतापर्यंत 84 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित भागातही पावसाच्या अनुषंगाने पेरणीचं काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्य सरकारकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबवली जात असून, पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत सरकारने कठोर भूमिका घेतल्याचं सांगताना भरणे म्हणाले की, आतापर्यंत 85 कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून, संबंधित कंपन्यांना बियाणे बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यंदा राज्यात मान्सून उशिराने दाखल झाल्याने जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे कृषी विभागाने योग्य पावसाशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं. त्यानंतर जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीला वेग आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, याचा फायदा उर्वरित पेरणी आणि पिकांच्या वाढीस होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
