Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला

Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला

| Updated on: Aug 06, 2026 | 12:37 PM

मराठा समाजातील कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, काही लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मराठा समाजातील कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, काही लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी येथे महत्त्वपूर्ण बैठक होत असून, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुढील भूमिकेवर चर्चा होणार आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका करत कायद्याच्या चौकटीबाहेर कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, नियमांमध्ये बसत नसल्यामुळे काही कुणबी जात प्रमाणपत्रांना वैधता मिळालेली नाही आणि त्यामुळे ती रद्द करण्यात आली आहेत. या प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या, काही विजयी झाले तर काही पराभूत झाले. आता ही प्रमाणपत्रे रद्द झाल्याने संबंधित जागा रिक्त होण्याची शक्यता असून, पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी लागू शकते. नागपूर जिल्हा परिषदेत यापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि मराठवाड्यातही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या समाजासाठी लढण्याचा अधिकार आहे आणि त्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, जर जात प्रमाणपत्रांना वैधता मिळत नसेल आणि ती कायद्याच्या चौकटीत बसत नसतील, तर सरकारने कोणत्याही दबावाखाली नियमबाह्य निर्णय घेऊ नयेत. कायदा आणि संविधानापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नसल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन कर्नाटकातील बेंगळुरू येथे होत आहे. या अधिवेशनात जरांगे पाटील यांच्या मागण्यांना विरोध करणारा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंजूर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली. ओबीसी समाज पुढील लढ्यासाठी सज्ज असून, याबाबत व्यापक रणनीती आखली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. बबनराव तायवाडे यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. “आता काँग्रेसमध्ये नव्याने ओबीसी नेते तयार झाले आहेत, पण त्यांना ‘जय ओबीसी’ म्हणायलाही लाज वाटते,” असा टोला त्यांनी नाव न घेता विजय वडेट्टीवार यांना लगावला. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा वाद, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी संघटनांची भूमिका यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

Published on: Aug 06, 2026 12:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us