मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणच्या शहरातून आम्हालाही मालमत्ता कर माफ करा, अशा मागणीचा सूर आळवण्यात आला. त्यात थेट पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नाशिकचाही समावेश होता. मात्र, नाशिकमध्ये घरपट्टी माफ होणे, तूर्तास तरी शक्य होणार नसल्याची चिन्हे आहेत. तसे संकेत महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. त्याला नेमके कारण काय आहे, घ्या जाणून.
नाशिकमध्ये येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणेच येथेही घरपट्टी माफ करण्याची राजकीय तयारी जोरदार सुरू आहे. सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी मालमत्ता कर माफ करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात येणार आहे. ते मुंबईप्रमाणेच नाशिकरांना सुद्धा न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या महापालिकेच्या सभेत तसा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.