Santosh Bangar : संतोष बांगरांना मंत्रिपद मिळणार? ‘या’ खात्यात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
अलीकडच्या काळात मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना, संतोष बांगर यांनी या संदर्भात आपली इच्छा बोलून दाखवली आहे. हिंगोली जिल्ह्याला आपल्या माध्यमातून मंत्रिपद मिळावे अशी त्यांची इच्छा आहे, असे म्हटले होते.
मंत्रिपद कोणाला नको असतं का? असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील फेरबदल होण्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाला आणि मंत्रिपद देण्यात आलं तर ते कोणाला नको असेल. मंत्रिपद कोणाला नको असतं का? मला मंत्रिपद दिलं तर मला आरोग्य क्षेत्रात काम करायला आवडेल’, असं सूचक वक्तव्य करत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपली इच्छा व्यक्त केली.
पुढे ते असेही म्हणाले, जर राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत असेल तर त्यासंदर्भातील मोठे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील, असंही संतोष बांगर यांनी म्हटलं. संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत राहिले आहेत. कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे.
