NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!

NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!

| Updated on: Jul 27, 2026 | 10:52 AM

नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणांमुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबतही गंभीर आरोप समोर आला आहे. अहिल्यानगर येथील उमेदवार ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच फुटल्याचा दावा केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणांमुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबतही गंभीर आरोप समोर आला आहे. अहिल्यानगर येथील उमेदवार ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच फुटल्याचा दावा केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ऋषिकेश गांगर्डे यांच्या आरोपानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक (क्लास-2) पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेतील प्रश्न आणि संभाव्य उत्तरे परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी, म्हणजे 20 मार्च रोजी काही उमेदवारांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आली होती.

गांगर्डे यांनी दावा केला की, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये उमेदवारांना 78 ते 80 प्रश्न बरोबर सोडवण्याच्या आणि उर्वरित 10 ते 12 प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, दोनशेपैकी सुमारे 90 प्रश्न पर्यायांसह तंतोतंत जुळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचाही गंभीर आरोप गांगर्डे यांनी केला. त्याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच संबंधित विभागाच्या मुख्य कार्यालयात लेखी तक्रार दिल्याचं त्यांनी सांगितलं.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि सत्य बाहेर आणावं, अशी मागणी ऋषिकेश गांगर्डे यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, नीट आणि टीईटी पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्यात पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून, या नव्या आरोपांमुळे परीक्षाप्रक्रियेबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Published on: Jul 27, 2026 10:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us