Bachchu Kadu : नागपुरात शेतकरी आंदोलक रेल्वे ट्रॅकवर, बच्चू कडूंच्या भेटीसाठी ‘हे’ दोन मंत्री येणार, चक्काजाम सुरूच

Bachchu Kadu : नागपुरात शेतकरी आंदोलक रेल्वे ट्रॅकवर, बच्चू कडूंच्या भेटीसाठी ‘हे’ दोन मंत्री येणार, चक्काजाम सुरूच

| Updated on: Oct 29, 2025 | 3:35 PM

नागपूरमधील शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चात प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. रेल्वे रुळांवर आंदोलक उतरल्याने तसेच प्रमुख महामार्ग बंद केल्याने चक्काजाम सुरू आहे. बच्चू कडू यांनी आंदोलकांना रेल्वे रुळांवर न जाण्याचे आवाहन केले आहे.

नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेल्या एल्गार मोर्चाने प्रशासनाची तारांबळ उडवली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. नागपूरच्या जामठा स्टेडियम परिसरातील रेल्वे रुळांवर काही आंदोलक उतरले होते, मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला केले. दिल्ली-कोलकाता रेल्वे मार्गावर संभाव्य खोळंबा टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जबलपूर, भंडारा, हैदराबाद, यवतमाळ आणि वर्धाकडे जाणारे प्रमुख महामार्ग आंदोलकांनी बंद केल्याने मोठ्या प्रमाणावर चक्काजाम सुरू आहे.

बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळावरून शेतकऱ्यांना रेल्वे रुळांवर न जाण्याचे आवाहन केले आहे, कारण सरकारसोबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, सरकारने चर्चेसाठी मुंबईला येण्याचे आवाहन केले असले तरी, बच्चू कडूंच्या मागणीनुसार, मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे दुपारी चार वाजता नागपूरमधील आंदोलनस्थळी कडूंची भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह अन्य मागण्यांवर या भेटीत चर्चा अपेक्षित आहे.

Published on: Oct 29, 2025 03:35 PM