राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा सोलापूर मनपा स्वबळावर लढवू असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी निवडणूक सोलापूरचा नक्षा बदलण्यासाठी असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. जे लोक आम्हाला सोडून गेले, त्यांची जनतेने सुट्टी केली, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. शरद पवार यांनी सोलापुरात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधताना हे विधान केलं. मधल्या काळात राष्ट्रवादीला सोडून अनेकजण जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीवर भरपूर छापून येत होतं. राष्ट्रवादीच्या भवितव्यावरही चिंता व्यक्त केली जात होती. पण जे आम्हाला सोडून गेले. त्यांची जनतेनेच सुट्टी केली, असा टोला पवार यांनी लगावला.