सचिन आला तर त्याची टीमही येणारच…त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
राज्यातील पक्षांतर घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार आणि एक आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर आणखी काही नेते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सचिन अहिर यांच्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांनीही मोठा दावा करत राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.
राज्यातील पक्षांतर घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार आणि एक आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर आणखी काही नेते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सचिन अहिर यांच्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांनीही मोठा दावा करत राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची साथ सोडत सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या घडामोडीनंतर सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील आणखी काही नेते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला होता. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनीही या दाव्याला दुजोरा देत, “सचिन अहिर आले आहेत, आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार आहे,” असे वक्तव्य केले. तसेच, “हे पक्षांतर आता कोणीही रोखू शकत नाही,” असा दावा करत त्यांनी ठाकरे गटातील आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटात येणार असल्याचे संकेत दिले.
यावेळी बच्चू कडू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करत, सध्याच्या परिस्थितीसाठी त्यांनाच जबाबदार धरले जात असल्याचा दावा केला. तसेच उद्धव ठाकरे यांनीही या घडामोडींनंतर नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, सुनील शिंदे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही बच्चू कडू यांनी, “सुरुवातीला अनेक जण नकार देतात, पण नंतर निर्णय बदलतात. पावसाचा जोर वाढेल तसाच ‘ऑपरेशन टायगर’चाही वेग वाढेल,” असे सूचक वक्तव्य केले.
बच्चू कडू यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
