मुंबई : हॅलो(Hello) या एका शब्दावरुन महाराष्ट्रात राजकीय गदारोळ(Political storm in Maharashtra) सुरु झालाय. याला कारण ठरलंय सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला एक निर्णय. महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही कार्यालयात तुम्ही फोन केला..तर समोरचा व्यक्ती तुमच्याशी हॅलो ऐवजी वंदे मातरम् असं बोलणार आहे. नव्यानेच सांस्कृतिक कार्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी(Sudhir Mungantiwar) हा निर्णय घेतलाय.
हॅलो हा शब्द इंग्रजांचा आहे…त्यामुळं ती आठवण पुसण्याची गरज असल्याचं मुनगंटीवार सांगतायत. वंदे मातरम् म्हणणं म्हणजे क्रांतीकारकांना वंदन करण्यासारखं आहे असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे.
हाच हॅलो शब्द आता सरकारी कार्यालयांमधून हद्दपार होणार आहे. मुनगंटीवारांनी हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश दिल्यामुळं काँग्रेसनंही आपली भूमिका स्पष्ट केलीय. हॅलो ऐवजी जय बळीराजा असं बोला असे आदेश नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. शासकीय कार्यालयात हॅलो ऐवजी वंदे मातरमचा वापर सुरु झाल्यानं मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंचीच अडचण झाल्याचं छगन भुजबळांचं म्हणणं आहे.
शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे आता जय महाराष्ट्रऐवजी वंदे मातरम् म्हणणार का असा सवाल भुजबळांनी विचारलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र विरोधी भूमिका घेतली आहे. सरकार कुठल्याही गोष्टीची सक्ती करु शकत नाही असं आव्हाड म्हणाले आहेत..
जेवढा वेळ अलेक्झांडर ग्रॅहम बेलला टेलिफोनचा शोध लावायला लागला नसेल…त्यापेक्षा जास्त वेळ महाराष्ट्रातले नेते वाद घालण्यात खर्ची घालू लागलेयत.