राजकारण जाईल चुलीत. मात्र, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय, असं म्हणत शनिवारी, 26 मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते शिर्डी विमानतळावर आले असता बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर झालेल्या प्रत्येक आरोपाचे सडेतोड उत्तर दिले. कोविड घोटाळ्याच्या आरोपापासून ते नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी रोखठोक भूमिका मांडत विरोधकांना जोरदार फटकारेही लगावले.