दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
मागाठाणे येथील प्रकाश सुर्वे आयोजित दहीहंडी उत्सवात इन्स्टाग्राम स्टार विनायक माळी ऊर्फ दादूसने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दहीहंडी फोडण्यावरील त्याचे मजेशीर विनोद, गोविंदा पथकांच्या मेहनतीचे कौतुक आणि खालच्या थरातील गोविंदांसाठी दिलेला महत्त्वाचा, पण विनोदी सल्ला हा कार्यक्रमाचा मुख्य विषय ठरला.
मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवाला यंदा इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय कलाकार विनायक माळी ऊर्फ दादूस यांनी खास उपस्थिती लावली. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी उपस्थितांना खळखळून हसण्यास भाग पाडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, माळी यांनी आपण बोरिवलीकर असल्याचे सांगत प्रेक्षकांशी संवाद साधला.
दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांचा उत्साह पाहून त्यांनाही दहीहंडी फोडावीशी वाटत असल्याची भावना व्यक्त केली, मात्र सोबतच दहीहंडी फोडण्याऐवजी स्वतःच्या डोक्याची अंडी फुटतील, असा विनोदी चिमटा काढला. त्यांनी उपस्थितांना विचारले की दहीहंडीमध्ये दही असते का, यावरही त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. माळी यांनी गोविंदा पथकांमधील खालच्या थरातील खेळाडूंचे महत्त्व अधोरेखित केले. खालच्या थरातील गोविंदा हे मनोऱ्याचा आधारस्तंभ असतात, त्यामुळे त्यांची निवड करताना काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या मते, खालच्या थरातील गोविंदा हे रिलेशनशिपमध्ये नसलेले असावेत कारण “बाबू जेवला का?” किंवा “बाबू झोपला का?” यांसारख्या प्रश्नांमुळे त्यांचा आधीच बॅलन्स बिघडलेला असतो, अशा विनोदी भाषेत त्यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांच्या या हजरजबाबी संवादाने दहीहंडी उत्सवाला एक वेगळीच रंगत आली.
