असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार…
ठाण्यातील एका कार्यक्रमात वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या क्रमात झालेल्या चुकीवरून आमदार प्रताप सरनाईक संतापले. केंद्रीय प्रोटोकॉलनुसार आधी वंदे मातरम, नंतर जन गण मन आणि शेवटी महाराष्ट्र गीत असा क्रम पाळणे आवश्यक आहे. आयोजकांनी चुका टाळाव्यात आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे वाहतूक विभागाने आयोजित केलेल्या रोड सेफ्टी कार्यक्रमात राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताच्या क्रमावरून आमदार प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय सूचनेनुसार, कोणत्याही शासकीय कार्यक्रमात आधी वंदे मातरम, त्यानंतर जन गण मन (राष्ट्रगीत) आणि नंतर महाराष्ट्र गीत वाजवले जाणे बंधनकारक आहे. मात्र, या कार्यक्रमात या क्रमाचे पालन झाले नसल्याचे समोर आले. सरनाईक यांनी आयोजकांना थेट फटकारत, “तुम्ही मूर्खपणा करता आणि आम्हाला खुलासा करावा लागतो,” असे म्हटले. गेल्या आठवड्यातही अशाच एका कार्यक्रमात वंदे मातरम ऐवजी ए. आर. रहमान यांचे वंदे मातरम हे गाणे वाजवण्यात आले होते, ज्यामुळे प्रोटोकॉलचा भंग झाला होता.
अशा चुकांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. भविष्यात गडकरी रंगायतनमध्ये अशा चुका टाळण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी आयोजकांना दिली. नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
