दम असेल तर पंतप्रधानांनी…; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

दम असेल तर पंतप्रधानांनी…; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

राखी राजपूत | Updated on: Jul 29, 2025 | 6:29 PM

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत ऑपरेशन सिंदूरच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

संसदेत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर तीव्र चर्चा सुरू आहे. या हल्ल्यादरम्यान सरकारने घेतलेले निर्णय आणि धोरणांवर विरोधकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत ऑपरेशन सिंदूरच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

राहुल गांधी म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ वेळा सांगितले की त्यांनी शस्त्रसंधी घडवून आणली. जर पंतप्रधानांमध्ये खरोखर धमक असेल, तर त्यांनी सभागृहात येऊन स्पष्ट करावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत. इंदिरा गांधी यांच्यासारखी धमक दाखवावी. त्यांच्या २५ टक्के तरी धैर्य असेल, तर त्यांनी सांगावे की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत. जर त्यांच्यात खरेपणा असेल, तर आज संध्याकाळी त्यांनी हे जाहीर करावे.

पुढे ते म्हणाले, भारतीय लष्कर आणि नौदलाने कोणतीही चूक केलेली नाही. चूक झाली ती आपल्या राजकारण्यांची. आपल्या नेत्यांनी पाकिस्तानला सांगितले की, आम्ही तुमच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करणार नाही. आम्ही एकदा गालावर थप्पड मारली, पण दुसरी मारणार नाही, असे सांगितले. हे का? कारण पंतप्रधानांची प्रतिमा जपण्यासाठी हे सर्व केले गेले. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, सर्व देशांनी दहशतवादाचा निषेध केला, आणि हे खरे आहे. पण त्यांनी हे लपवले की, पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा थेट निषेध केला नाही, केवळ दहशतवादाचा निषेध केला. याचा अर्थ जग पाकिस्तानच्या बाजूने आहे. पहलगाम हल्ल्यामागे जनरल मुनीर आहे, आणि ते ट्रम्प यांच्यासोबत जेवत आहेत. ट्रम्प सर्व प्रोटोकॉल तोडून मुनीर यांचे स्वागत करतात, पण पंतप्रधान त्यांचा निषेधही करत नाहीत.

Published on: Jul 29, 2025 6:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us