Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत…
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक मंदिर न्यासाशी संबंधित एका पत्राचा उल्लेख केला. या पत्रात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रात दर बुधवारी दानपेटीतील रकमेची मोजदाद कर्मचारी पकडण्यापूर्वी सुमारे 50 लाख रुपयांच्या आसपास होत होती. मात्र, कथित चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर हीच रक्कम सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचा अपहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि विश्वस्त मंडळाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पत्रात करण्यात आल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. श्रद्धेने भक्तांनी दानपेटीत टाकलेला पैसा धर्मकार्यासाठी वापरला जावा, मात्र त्याच पैशाची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी तरुणांच्या वाढत्या असंतोषाचाही संदर्भ देत सरकारवर टीका केली. “सरकारवर विश्वास ठेवता येत नाही म्हणून लोक देवळात जातात, पण मंदिरातही चोरी होत असेल तर नागरिकांचा विश्वास कुठे राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरुणांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि समाजातील वाढती अस्वस्थता समजून घेण्याची गरज सरकारने ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, सध्याचा जनतेचा उद्रेक हा केवळ एका घटनेमुळे नसून त्यामागे अनेक गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय कारणे आहेत. सरकारने राजकारणापलीकडे जाऊन तरुणांच्या आकांक्षा आणि नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
