महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत आणि ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेससचे र्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. महाराष्ट्रात जातीवादाचं विष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तसंच शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केला होता. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरुनही राज यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तसंच इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांचं नाव घेत त्यांच्यावरही टीका केली होती. त्यावरुन आता श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. कोण ते कोकाटे समजून घेण्यासाठी राज ठाकरेंनी माझं भाषण ऐकायला यावं, असा खोचक सल्लाही कोकाटे यांनी राज ठाकरेंना दिलाय.