राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. राज्यात बेरोजगारीसह शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. राज्याला लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करावं असं आवाहन हनुमान जयंती दिनी केली होती. त्यानंतर आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं आहे. त्याचवेळी मातोश्रीवर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केलीय. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार, असा दावा राणा दाम्पत्याने केलाय. त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.