मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या वतीनं हवामानाचा सुधारित अंदाज जारी करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार राज्यात पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या पावसानं हजेरी लावली आहे. रविवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी देखील जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं 19 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.