Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाद्वारे त्यांनी सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाद्वारे त्यांनी सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी सरकारवर आरोप करत म्हटले आहे की, कर्जमाफी योजनेत काही जाचक अटी घालण्यात आल्या असून त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. या अटी मागे घेतल्याशिवाय अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, या आंदोलनाबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनातील मुद्दे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय घेण्याची विनंती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीबाबत बोलताना भरणे म्हणाले की, राज्याच्या तिजोरीवर ताण असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शेतकऱ्यांचे समाधान होणे शक्य नसले तरी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहितीही दिली. “मी काल रात्री रोहित पवार यांच्याशी दोन वेळा फोनवरून संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली आहे. मंगळवारी रोहित पवार आणि मुख्यमंत्री यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये त्यांच्या मागण्या आणि आक्षेपांवर सविस्तर चर्चा होईल,” असे भरणे यांनी सांगितले.
सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, बैठकीनंतर सकारात्मक तोडगा निघेल आणि गैरसमज दूर होतील, असा विश्वासही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.