Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून… पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
सांगली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे गंभीर सावट आहे. मिरज तालुक्यातील काननवाडी येथील शेतकरी गोपाळ मगदूम यांनी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून केलेल्या सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दिवाळी ऐवजी शिमगा करण्याची वेळ आली असून, शासनाकडे तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी करत आहेत.
सांगली जिल्ह्यासह पूर्व भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. मिरज तालुक्यातील काननवाडी येथील शेतकरी गोपाळ मगदूम यांच्या ७ एकर शेतीतील पीक पूर्णपणे करपून गेले आहे. त्यांनी नगदी पीक म्हणून लावलेल्या सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च केले होते. हा खर्च भागवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागले होते.
पाऊस नसल्याने जमीन भेगाळून पिके जळून गेल्याने गोपाळ मगदूम यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. दिवाळी सणात आनंदोत्सव साजरा करण्याचे त्यांचे स्वप्न भंगले असून, आता त्यांच्यावर शिमगा करण्याची वेळ आली आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी त्यांची आर्त विनंती आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून, त्यांना तातडीने मदत न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
