कृष्णेच्या पात्रात 3 दिवसांपासून हजारो माशांचा मृत्यू!

कृष्णेच्या पात्रात 3 दिवसांपासून हजारो माशांचा मृत्यू!

| Updated on: Feb 27, 2026 | 10:14 AM

सांगलीतील कृष्णा नदीत गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. दूषित सांडपाणी, साखर कारखान्यांतील मळीमिश्रित पाणी आणि औद्योगिक सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही घटना घडली आहे. यावर पर्यावरण विभागाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मोठ्या प्रमाणात मृत पावत आहेत. बोरगाव बंधाऱ्याजवळ आणि नदीच्या काठावर मृत माशांचा खच पडलेला दिसून येत आहे. वारंवार नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याने मासे गुदमरून मरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रदूषित पाण्याबरोबरच साखर कारखान्यांमधून येणारे मळीमिश्रित पाणी आणि औद्योगिक सांडपाणीही थेट कृष्णा नदीच्या प्रवाहात मिसळले जात आहे. यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन माशांचा जीव गुदमरत आहे. शेरीनाला आणि मळीच्या मिश्रणामुळे माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला असून, परिसरातील गावांमध्ये दुर्गंधी पसरली आहे.

या गंभीर घटनेमुळे पर्यावरण विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार अशा घटना घडूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांकडून दूषित पाण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांनी पिण्यासाठी पाणी उकळून प्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासनाने या जलप्रदूषणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: Feb 27, 2026 10:14 AM
Follow Us