संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना पेगासस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. विद्यमान सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही. हे तुम्हाला सरकार सतेत आल्यापासून जाणवत असेल. संसद चालवणं ही सरकारची जबाबदारी असते. पण त्यांची ही इच्छा दिसत नाही. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे.
चर्चेवेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उपस्थित राहावे. त्यानंतर न्यायालयीन चौकशी नेमायची का किंवा जेपीसी नेमायची का हा नंतरचा विषय आहे, असं राऊत म्हणाले. पेगाससचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांनी तिथे असण्याने त्याने फरक पडत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ते ऐकलं पाहिजे.