Sanjay Raut | न्यायव्यवस्थेला वाळवी लागले….न्यायालयांवर दबाव आहे….; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना न्यायव्यवस्था आणि न्यायालयीन प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका कथित जमीन व्यवहार प्रकरणावर भाष्य करताना राऊत यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर थेट टीका केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना न्यायव्यवस्था आणि न्यायालयीन प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका कथित जमीन व्यवहार प्रकरणावर भाष्य करताना राऊत यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर थेट टीका केली. “जर एखाद्या मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्याने खासगी मालकाला जमीन वर्ग करण्याचा निर्णय घेतला असता आणि त्याविरोधात कोणी न्यायालयात गेले असते, तर न्यायालयाने तात्काळ त्या प्रक्रियेला स्थगिती दिली असती. संबंधित मंत्री, अधिकारी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं, त्यांच्यावर ताशेरे ओढले असते, कदाचित त्यांच्या नोकऱ्यांवरही गदा आली असती,” असे राऊत म्हणाले.
मात्र, “त्याच प्रकारचा निर्णय जर न्यायालयाकडून झाला असेल, तर त्यांना जाब कोण विचारणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचा संशय व्यक्त करत, “निवृत्तीनंतर अनेक न्यायाधीश स्वतः सांगतात की न्यायालये दबावाखाली काम करतात. न्यायव्यवस्थेला वाळवी लागल्याचे वक्तव्य माजी मुख्य न्यायाधीशही करत आले आहेत,” असेही नमूद केले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात न्यायालय आणि कायद्याच्या चौकटीत राहून मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत राऊत यांनी संबंधित जमिनीची किंमत तब्बल 10 हजार कोटी रुपये असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि न्यायव्यवस्थेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.