Sanjay Raut UNCUT | जो ठाकरेंचा होऊ शकला नाही, तो जरांगेंचा कसा होणार?; बंडू जाधवांवर संजय राऊतांचा घणाघात
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी प्राण पणाला लावून लढत असून, सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याची चिंता राऊत यांनी व्यक्त केली. मध्यंतरी आपण जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली होती आणि वारंवार उपोषण करू नका, प्रकृतीची वाट लावून घेऊ नका, असा सल्ला दिल्याचेही राऊत यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी प्राण पणाला लावून लढत असून, सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याची चिंता राऊत यांनी व्यक्त केली. मध्यंतरी आपण जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली होती आणि वारंवार उपोषण करू नका, प्रकृतीची वाट लावून घेऊ नका, असा सल्ला दिल्याचेही राऊत यांनी सांगितले.
परभणीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असताना खासदार संजय बंडू जाधव यांनी शेतकरी मेळावा आयोजित करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले. हा मेळावा रद्द करावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. मात्र, जाधव यांनी मेळावा घेतल्याने या वादाला राजकीय रंग आला. यावर बोलताना राऊत यांनी जरांगे पाटील यांची तळमळ आणि तडफड आपणही पाहिली असल्याचे म्हटले.
संजय राऊत यांनी संजय बंडू जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली. जाधव यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी मदत केली, हे सत्य असल्याचे राऊत म्हणाले. जरांगे पाटील यांनी अशी अपेक्षा केली असेल, तर जाधव यांनी त्यांचा त्याग करायला हवा होता, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे सत्ता आणि पदे भोगल्यानंतरही जाधव ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, मग ते जरांगे पाटील यांचे कसे होतील, असा टोला राऊत यांनी लगावला.
“जो माणूस ठाकरेंचा होऊ शकत नाही, त्यांच्याकडून जरांगे पाटलांनी काय अपेक्षा करावी?” असा सवाल करत राऊत यांनी जाधव यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. जाधव यांनी ठाकरेंशी गद्दारी केल्याचा आरोपही त्यांनी केला. जरांगे पाटील यांनी धडा शिकवण्याची भूमिका घेतली असून, त्यांचा स्वभाव पाहता ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही संजय राऊत यांनी टीका केली. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या प्रश्नावर मार्ग काढण्याची गरज असल्याचे राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्री नागपुरात बसून केवळ “चर्चा करून मार्ग काढू” अशी विधाने करत आहेत, असा आरोप करत आतापर्यंत कोणत्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढला, ते त्यांनी सांगावे, अशी मागणी राऊत यांनी केली.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापले आहे. त्यातच संजय राऊत यांनी संजय बंडू जाधव आणि राज्य सरकारवर केलेल्या या टीकेमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.