आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नावर सविस्तर उत्तरे देत केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.