गुढी पाडव्यापासून मनसे मुंबईत अधिकच आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे सैनिकांनी मुंबईत हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली आहे. घाटकोपरच्या चांदिवलीमध्ये सर्वात आधी हनुमान चालिसा लावल्यानंतर आज राम नवमीचं निमित्त साधून मनसे सैनिकांनी चक्क शिवसेना भवनासमोरच हनुमान चालिसा लावला आहे. एका टॅक्सीवजा रथावर भोंग्या लावून हा हनुमान चालिसा लावण्यात आला आहे. हा रथ मुंबईतील काही भागात फिरवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे येत्या काळात अधिक आक्रमक होण्याची चिन्हे असून त्यामुळे मुंबईतील राजकारण ढवळून निघणार आहे.