कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालीय. अशावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. कुठल्याही स्थितीत लसीकरणाला अग्रक्रम द्यावा लागेल. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, पण त्यापूर्वी आपण महाराष्ट्राला 70 टक्के लसीकरण केलं तर येणाऱ्या लाटेची गंभिरता तेवढी राहणार नाही, असं टोपे यांनी म्हटलंय. महत्वाची बाब म्हणजे ज्यांनी ज्यांनी लस घेतली त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले आहेत त्यांना कोरोना होण्याचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.