मुंबई : राज्यात गृहखात्याच्या कारभारावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस सुरु असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत गृहखातं उदासिन असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा सुरु आहेत. या बेबनावाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान गृहखात्याला अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केलीय.