गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात हाहा:कार पाहायला मिळाला. सततच्या मुसळधार पावसामुळे आणि काही ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेली आहेत. अनेक ठिकाणी पिकांसह जमीन खरवडून गेली आहे. राज्यात आतापर्यंत केवळ 81 ठक्के पंचनामे झाले असून तब्बल 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती खुद्द मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. सोयाबीन, मुग, उडीद, ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरश: टाहो फोडलाय. अनेक शेतकऱ्यांनी आता आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलंय. दरम्यान, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना तातडीने पंचनामे करुन सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी केलीय.
राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.