मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याची मागणी केली याला भाजपने पाठिंबा दिला. मात्र आता त्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मशीदीवरील भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय. महाराष्ट्रात तसं काही होईल असे वाटत नाही. पोलीस लक्ष ठेवून आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. भाजपच्या या अजेंडयाची सुरूवात कर्नाटक राज्यातून झाली आहे, आता अन्य राज्यांमध्येही हा अजेंडा भाजपने सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आज राज्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक झाली, या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.