एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी खुद्द पवारांचीच पुन्हा एकदा एंट्री झाली..आणि जे हायकोर्टात कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढा देत आहेत, त्या गुणरत्न सदावर्तेंनाच हटवलं. मात्र भाजपनं आता पवारांच्या बैठकीवरच सवाल उपस्थित केलेत. परिवहन मंत्री अनिल परब आणि 22 संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवारांनी मुंबईत सह्याद्रीवर बैठक घेतली. मात्र पवारांनी घेतलेलीही ही बैठकच बेकायदेशीर असल्याचा सूर, भाजपचा आहे. मुख्यमंत्र्यांनी पवारांना चार्ज दिला का ? असा सवाल राम कदमांनी केलाय. तर परिवहन मंत्री अनिल परब शरद पवारांना भेटतात. मग आझाद मैदानात जाऊन कर्मचाऱ्यांना का भेटत नाहीत ? असा प्रश्न एकेकाळी आझाद मैदानातून कर्मचाऱ्यांसोबत लढा देणाऱ्या पडळकरांचा आहे.
भाजपची माझ्यावरील टीका ही अज्ञानातून असल्याचा पलटवार खुद्द पवारांनी केलाय. भाजप नेत्यांच्या टीकेबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना ‘त्यांच्या ज्ञानाबद्दल मी कौतुक करतो. एखाद्या कामगार संघटनेनं मला किंवा अजून कुणाला बोलावलं तर लोकशाहीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांच्या अधिकार आहे की नाही.त्या अधिकाराने त्यांनी चर्चा केली असेल तर त्यात काही वावगं नाही. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय़ घेतात. त्यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून प्रत्यक्ष समोर यायला त्यांना मर्यादा होत्या. पण हे जरी असलं तरी परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली असणार. महत्वाचे आणि धोरणात्मक निर्णय हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्रीच घेतात’, असं पवार यांनी स्पष्ट केलंय.