महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो. महत्वाची बाब म्हणजे विरोधकांच्या या दाव्याचा प्रत्ययही वेळोवेळी येतो. अशावेळी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. भुजबळ यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केलाय. कांदे यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ यांच्यावरील आरोपात तथ्य आहे असं मला वाटत नाही. अशी तक्रार करायची असेल तर सुहास कांदे यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असती तर त्याची शहानिशा करण्यात आली असती. पण कांदे कोर्टात गेल्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे यावर बोलणं योग्य नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.