विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरुन, राज्यपालांसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी सरकारनं नवं पाऊल टाकण्याचं ठरवलंय. जी यादी राज्यपालांना दिली होती, त्या यादीतून राजकीय नावं वगळून सरकार नवी यादी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. म्हणजेच खडसे, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत यांची नावं वगळली जाऊ शकतात. याआधी सरकारनं दिलेल्या यादीत कोणती नावं होती तेही पाहुयात. शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांची नावं आहेत. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, यशपाल भिंगे, आनंद शिंदे आणि राजू शेट्टी आणि काँग्रेसकडून सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर, मुझफ्फर हुसैन आणि रजनी पाटील यांची नावं राज्यपालांकडे देण्यात आलीय. या यादीपैकी राजू शेट्टींनी महाविकास आघाडीचा पाठींबा काढत, राज्यपालांना आपल्या नावाचा विचार करु नये, असं लेखी पत्रच दिलंय.