राज्यातील 6 जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ अनपेक्षितपणे काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांक पटकावलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जोरदार पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ ठरल्याचं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक निकालातून दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून, ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करू शकलो. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला.