मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजय गुजर यांनी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र गुजर यांचा निर्णय अमान्य करत एसटी कर्मचाऱ्यांनी दुखवटा चालूच ठेवला आहे. यापूर्वी 28 युनियनने संपातून माघार घेतली तरी दुखवट्याला काहीही फरक पडला नाही, ही 29 वी युनियन आहे, या युनियनमध्ये माणसे नाहीत, अशी प्रतिक्रिया यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.
यांना जास्त महत्व देऊ नका
या कष्टकऱ्यांचा दुखवटा आहे. त्यामुळे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वासही सदावर्तेही यांनीही व्यक्त केला आहे. तर शरद पवारांचे राजकारण या ठिकाणी येईल हे आधीच वाटलेले, गुजर हे शरद पवारांच्या याच राजकारणाला बळी पडले असतील अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या संघटनेच्या बळावर दुखवटा सुरू नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या बळावर हा दुखवटा सुरू आहे, कृपाकरून कष्टकऱ्यांना वाईट वाटेल असे, बोलू नये असे आवाहनही सदावर्तेंनी केले आहे.