अमरावती: अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. आजही अमरावतीत तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रचंड लाठीमार केला. मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे दंगल रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. पाचपेक्षा अधिक लोक एकत्रं आल्यास त्यांना तात्काळ अटक केली जाणार आहे. अमरावतीत राजकमल चौकात आज प्रचंड हिंसाचार झाला. जमावाने प्रचंड दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान केलं. तसेच एका पानटपरीलाही पेटवून दिलं. हातात लाठ्याकाठ्या घेऊन फिरणाऱ्या जमावाला पोलिसांनी प्रचंड चोप दिला. त्यानंतरही हा जमाव हटायचं नाव घेत नसल्याने पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच पाण्याचा माराही करावा लागला. मात्र, नंतर एसआरपीएफच्या तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आणि त्यांनी दिसेल त्याला बेदम चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमाव पांगला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीसही गल्लोगल्ली फिरून कानोसा घेत आहेत.