जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; 2029 च्या राजकारणाची रंगीत तालीम सुरू?
राज्यातील राजकारणात 2029 च्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद रंगला आहे. “2029 साली सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी बारामतीकरांची इच्छा आहे,” असे वक्तव्य जय पवार यांनी केले. तसेच, “2029 मध्ये सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील,” असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील राजकारणात 2029 च्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद रंगला आहे. “2029 साली सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी बारामतीकरांची इच्छा आहे,” असे वक्तव्य जय पवार यांनी केले. तसेच, “2029 मध्ये सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील,” असेही त्यांनी म्हटले आहे.
या वक्तव्यानंतर महायुतीतील नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जय पवार यांची बाजू घेत प्रतिक्रिया दिली. “आई मुख्यमंत्री व्हावी, यात गैर काय आहे? जय पवार यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे. भविष्यात काय घडेल, हे येणारा काळच ठरवेल,” असे शिरसाट म्हणाले.
दरम्यान, भाजप आमदार अमित साटम यांनीही या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली. “मुख्यमंत्री होण्याची इच्छा ठेवण्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि नेत्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा अंतिम निर्णय राज्यातील साडेबारा कोटी जनता घेईल,” असे अमित साटम यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया देत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? युती झाली म्हणजे फक्त भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, असा हट्ट असण्याचे कारण नाही,” असे बच्चू कडू म्हणाले.
जय पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना वेग आला असून, आगामी काळात मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून महायुतीत नवे राजकीय संकेत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
