Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर…; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या राजकीय योगदानाचे कौतुक करत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “छगन भुजबळ यांनी शून्यातून आपले राजकीय विश्व उभे केले आहे. पक्षासाठी त्यांनी मोठे त्याग आणि परिश्रम घेतले असून, ते नेहमीच शरद पवार यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात कायम कृतज्ञतेची भावना आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शरद पवार यांची नेहमीच इच्छा होती की छगन भुजबळ यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करावे. “भुजबळ दिल्लीत गेले असते, तर देशाला एक अनुभवी आणि सक्षम नेतृत्व मिळाले असते. तसेच आमच्यासारख्या नव्या खासदारांनाही त्यांच्या अनुभवाचा लाभ झाला असता,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अजित पवार गटातील उमेदवारी आणि मंत्रिपदाच्या चर्चांबाबत भाष्य करताना, “त्यांच्या पक्षात किंवा कुटुंबात काय सुरू आहे, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे,” असे सांगत सुळे यांनी अधिक भाष्य टाळले. राज्यसभा उमेदवारीच्या या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
