बीड : राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या म्हणजे देंगे दिलाएंगे असून लोकप्रियता मिळवण्यासाठी सरकारने हा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवासासाठी सवलत मिळाली असली तरी दुसरीकडे मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारांवर देखील भाष्य करत सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, तर आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना काय मिळालं असा देखील सवाल त्यांनी सरकारला केला आहे. पन्नास वर्षाच्या काळातला हा जर सर्वात चांगला अर्थसंकल्प आहे असं जर हे म्हणत असतील तर मग फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा चुकीचा होता का आणि फडणवीस यांना अर्थसंकल्प सादर करण्याचा ज्ञान नाही असा त्याचा अर्थ होतो असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.