ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी घराच्या बाहेर लाठ्या-काठ्या आणि दगड, स्टंप आणि बाटल्या आढळून आल्या. याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. तर या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव याने केला आहे. तर या हल्ल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी विक्रांत जाधव यांनी केली आहे. तर मी रणागंण सोडून पळणारा नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तर माझं संरक्षण फडणवीसांनी काढलं असावं म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. याचदरम्यान नितेश राणे यांनी नारायण राणेंवर कोण खालच्या पातळीवर जात टीका करत असेल तर आमचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असे म्हटलं आहे. त्याचबरोबर भास्कर जाधव यांचे तोंड आणि जीभ त्यांच्या पक्षप्रमुखांनी आवरायला हवं असेही राणे म्हणाले. भास्कर जाधव असोत की आणि अन्य कोणी शिवसैनिक त्यांच्यावर हल्ला केल्यास जशाच तसे उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. तर अंधेरी पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पळपुटे कोण हे मुंबई पालिकेच्या निवडणुकीत दाखवू असे म्हटलं आहे.