विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. राज्यपालांच्या विरोधानंतरही सर्व तामझाम करून आघाडी सरकारने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीला केलेला विरोध आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक न घेण्याचा दिलेला सल्ला यामुळे अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी 11 वाजता सरकारला एक बंद लिफाफा पाठवून त्यांना पुन्हा एकदा आपलं मत कळवलं. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली. सत्ताधारी नेत्यांनी या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून चर्चा केली. यावेळी स्वत: अजित पवार यांनी राज्यपालांचं मत डावलून निवडणूक घेण्यास विरोध केला. राज्यपालांचं मत डावलून निवडणूक घेतल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. तसेच राज्यपालांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, असं अजित पवार यांचं म्हणणं पडल्याचं सूत्रांनी सांगितलं.