Uday Samant : कर्नाटकात शिवरायांचे पुतळे हटवले, सावरकरांवर टीका… राज ठाकरेंना काँग्रेसची भूमिका मान्य? उदय सामंत यांचा खरमरीत सवाल

Uday Samant : कर्नाटकात शिवरायांचे पुतळे हटवले, सावरकरांवर टीका… राज ठाकरेंना काँग्रेसची भूमिका मान्य? उदय सामंत यांचा खरमरीत सवाल

| Updated on: Oct 13, 2025 | 1:33 PM

राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्यास सावरकरांबद्दल काँग्रेसची भूमिका आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून जाब विचारतील, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला स्वीकारार्ह असतील का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरू असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची भूमिका आणि कर्नाटकात मराठी माणसाला त्रास देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवणाऱ्या काँग्रेस सरकारला नक्की जाब विचारतील, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी सातत्याने आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, विशेषतः भोंग्यांविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे ते चर्चेत राहिले आहेत. अशा आक्रमक हिंदुत्ववादी नेत्याला काँग्रेस स्वीकारेल का, हा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत जर राज ठाकरेंना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील, तर आधी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधले होते आणि आता राज ठाकरेंच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का, असा सवालही सामंत यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.

Published on: Oct 13, 2025 01:31 PM