2 रुपयांचा पिकविमा देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली! ठाकरेंचा घणाघात

2 रुपयांचा पिकविमा देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली! ठाकरेंचा घणाघात

| Updated on: Nov 05, 2025 | 3:39 PM

उद्धव ठाकरे यांनी पीक विम्याच्या २, ३, ६ रुपये अशा तुटपुंज्या रकमेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे सांगत त्यांनी विमा कंपन्यांना इशारा दिला. शेतकऱ्यांनी मिळालेल्या पावत्या जमा कराव्यात, असे आवाहन करत ठाकरे यांनी महिनाभरात पूर्ण नुकसान भरपाई न दिल्यास कंपन्यांच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नावाखाली मिळत असलेल्या तुटपुंज्या भरपाईवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांचे पीक पावसाने पूर्णतः उद्ध्वस्त झाले असताना, त्यांना २, ३, ६ किंवा २१ रुपये अशी अत्यल्प मदत मिळत आहे, ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. पीक विम्यासाठी शेतकरी प्रति एकरी किमान १२०० रुपये भरत असताना, नुकसान भरपाई म्हणून इतकी कमी रक्कम मिळणे हे अन्यायकारक आहे.

ठाकरे यांनी कार्यकर्ते ओम दादा, कैलास दादा आणि प्रवीण दादा यांना आवाहन केले आहे की, ज्या शेतकऱ्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांच्याकडून विमा कंपन्यांकडून मिळालेल्या पावत्या आणि त्यांनी विमा कोणत्या कंपनीकडून घेतला, कोणत्या योजनेची नोंदणी केली याची माहिती गोळा करावी. येत्या महिनाभरात विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई न दिल्यास, सर्व शेतकरी विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर धडक देतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना’ म्हणजे ‘फसल’ झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Published on: Nov 05, 2025 03:39 PM