Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांना लवकरच निकाल लागेल असा इशारा दिला आहे. भाजपने खालच्या पातळीवर राजकारण केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. भविष्यात बाहेरील मतदार घुसण्याची भीतीही त्यांनी वर्तवली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांना लवकरच निकाल लागेल असा सज्जड इशारा दिला आहे. बीडमधील अडीचशे बीएलएंसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले गेल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. भविष्यात दोन कोटी घुसविले जातील, खरे की खोटे कुणाला कळणार आहे? अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी खालच्या पातळीवर डावपेच केल्याचा आरोप करत, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्येही मतदार वगळल्याचा संदर्भ दिला. महाराष्ट्रात लोकसभा ते विधानसभा या काळात ४५ लाख मतदार वाढले, तर आता दोन कोटी कमी झाले, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. महाराष्ट्र पुन्हा भगवा करून शिवसेनामय करण्याची हाक त्यांनी दिली. गद्दारी करणारे शिवसैनिक नसून ती शाहसेना आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
