अमरावती हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय. अमरावतीमध्ये आम्ही शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदू आणि मुस्लिम अशा सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावत आहोत. अमरावतीमध्ये जे घडलं तो एक कट होता आणि हा कट रचला गेला होता. अॅक्शनला रिअॅक्शन देण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडला. ज्यांनी घडवलं तेच आरोप करत सुटले आहेत. सरकारचा प्रयत्न परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सुरु आहे. इंटरनेट सेवा आज किंवा उद्यापर्यंत सुरु व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती दौऱ्यावर येण्याचं सूतोवाच केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी सोमय्या यांच्यावर टीका केलीय. किरीट सोमय्या यांनी अजून 15 दिवस तरी अमरावतीत येऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर किरीट सोमय्या यांनी आपला अमरावती दौरा पुढे ढकलला आहे.