AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खत आणि युरियाचा तुटवडा? मग इथं करा तक्रार… यंत्रणा लागलीच हलणार, असा होणार फायदा

Kisan Complaint: अनेक ठिकाणी पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी पेरणी रखडली आहे. काही भागात खत आणि युरियाची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. खत आणि युरियाचा काळाबाजार होण्याची शंका येत असेल तर लागलीच जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करा. नाहीतर या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

खत आणि युरियाचा तुटवडा? मग इथं करा तक्रार... यंत्रणा लागलीच हलणार, असा होणार फायदा
| Updated on: Jul 15, 2026 | 4:10 PM
Share

Kisan Complaint: पावसामुळे अनेक भागात शेतीच्या कामाची लगबग वाढली आहे. पेरण्या झाल्या आहेत. पिकांना वेळेवर खतं आणि युरिया मिळावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशावेळी जर दोन्ही गोष्टी वेळेवर मिळत नसतील अथवा त्यांचा काळाबाजार सुरू असल्याचे तुमच्या लक्षात आले तर त्याची तक्रार जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे करता येते. जर अधिकारी दखल घेत नसतील तर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक आणि तक्रार कक्ष सुरू करण्यात आला आहे. कृषी खात्याच्या साईटवरही शेतकऱ्यांना तक्रार करता येते.

कॉल सेंटरवर करा तक्रार

तुमच्या भागात खताची कमी असेल अथवा सहकारी सोसायटी खत, युरिया देण्यास नकार देत असेल. तर सर्वात अगोदर तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करा. प्रत्येक जिल्हा, तालुक्याला कृषी विभागाचे कार्यालय असते. तिथे तुम्ही अधिकाऱ्याकडे लेखी अथवा तोंडी तक्रार करू शकता. तुमची अडचण अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवा. जर अधिकाऱ्याने काहीच कारवाई केली नाही. अथवा तुम्हाला समाधानकारक उत्तर दिले नाही तर शेतकऱ्यांसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. तुमच्या मोबाईलवरून किसान कॉल सेंटरवर 1800-180-1551 या क्रमांकावर कॉल करू शकता. तक्रार आल्यानंतर कृषी खात्याकडे याविषयीची विचारणा होते आणि त्यांना तात्काळ काय कारवाई केली याची माहिती देण्यास सांगण्यात येते.

फसवणूक होत असल्यास आवाज उठवा

अनेकदा दुकानदार निश्चित किंमतीपेक्षा जास्त पैसा वसूल करतात. खत, युरियासोबत दुसरा शेतीविषयक माल माथी मारण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार कायद्याला धरून नाही. याविषयीची तक्रार शेतकऱ्याला करता येते. जिल्हाधिकारी, स्थानिक पोलिसांकडे तुम्ही तक्रार देऊ शकता. या यंत्रणांनी जर मदत केली नाही तर शेतकऱ्यांना याविषयीची लेखी तक्रार करता येते.

सरकारने ऑनलाईन तक्रार करणे अत्यंत सोपे आणि सहज केले आहे. केंद्र सरकारच्या पीजी पोर्टलवर pgportal.gov.in वर तक्रार करता येते. याठिकाणी शेतकरी खताची कमी वा काळाबाजाराविषयी ऑनलाईन तक्रार करू शकतो. या तक्रारीवर थेट कारवाईचे निर्देश देण्यात येतात. गावातील कृषी पर्यवेक्षकाकडेही शेतकरी तक्रार करू शकतो. गावातील पोलीस पाटील, सरपंच यांच्यामार्फतही तक्रार करता येते. ग्रामपंचायतीपर्यंत सामुहिक तक्रार करता येते. गावाकडून तक्रार आल्यास त्याचा प्रशासनावर दबाव पडतो.

वेळेवर खत न मिळाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते. या काळाबाजार अथवा तुटवड्यावर मौन बाळगू नका. लागलीच तक्रार करा. खत अथवा बि-बियाणे हे अधिकृत दुकानदाराकडूनच खरेदी करा. त्याच्याकडून पक्की पावती घ्या. असे केल्यास पुढे तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे ठोस पुरावा हाती असेल. अशा फसवणुकीविरोधात तक्रार दाखल करता येईल.

Follow Us