Piyush Goyal: डंके की चोट पर… शेतकर्यांना काडीचाही नाही फटका, पीयूष गोयल यांचा भारत-अमेरिका व्यापार करारावर मोठा डंका
Piyush Goyal on US-India Trade Deal: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठे भाष्य केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारामुळे शेतकरी अथवा कृषी जगतावर संकट येणार असा दावा करण्यात येत होता. त्यावर त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

Piyush Goyal on US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील व्यापारी करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र धोक्यात आल्याचा दावा विरोधक दोन दिवसांपासून करत होते. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी जोपर्यंत या कराराची प्रत समोर येऊन स्पष्टता येत नाही तोपर्यंत शेतकर्यांशी संबंधित चिंता व्यक्त केली होती. आता देशाचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या चिंता निरर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते हा करार दबावाखाली झालेला नाही. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे आणि कृषी क्षेत्राचं कोणतंही नुकसान होणार नाही. या कराराविषयी त्यांनी संक्षिप्तपणे काही ठळक मुद्दे समोर आणले आहेत.
भारत आणि अमेरिकेत रखडलेला व्यापारी करार अखेर पूर्णत्वास गेला. 13 फेब्रुवारी, 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय व्यापारी करारवर पहिल्यांदा औपचारिक बोलणी झाली होती. पण रशियाकडून इंधन खरेदीच्या मुद्दावर संबंध ताणल्या गेले आणि राजकीय वाद पेटला. काल परवा डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवल्याचे जाहीर केले. तसेच नियमीत टॅरिफमधील 7 टक्क्यांची कपात केल्याचे जाहीर केले. आता भारतावर 18 टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचं काडीचंही नुकसान नाही
काही लोक भारतीय शेतकऱ्यांची चिंता करण्याचे ढोंग करतात. पण त्यांना त्यांची चिंता नाही. भारत आणि अमेरिकेतील या व्यापारी करारामुळे भारतीय शेतकऱ्यांना नुकसान होईल असे दावे खोटे असल्याचा दावा मंत्री पीयूष गोयल यांनी केला. अमेरिकेतून आयात वस्तू, उत्पादनं आणि कृषी संबंधित कोणत्याही वस्तू, उपकरणं, सयंत्र यांच्यावर कोणतीही आयात सवलत देण्यात आलेली नाही असे गोयल यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रात आता इतर वस्तूमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, असे गोयल म्हणाले.
आम्ही असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना नुकसान होईल. ज्या वस्तू भारतीय शेतकरी तयार करतात. जो माल उत्पादित करतात. ज्यात भारत स्वयंपूर्ण आहे. त्या सर्व वस्तू, उत्पादनं या कराराच्या बाहेर आहेत. भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी क्षेत्रातील वस्तूंवर कोणतीही सवलत दिलेली नाही.जेनेटीक उत्पादन भारतात येणार नाही. मांस आयातीवर कोणती शुल्कमाफी देण्यात आलेली नाही. कुकुटपालन व्यवसायात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. दूध आणि दुग्धजन्य उत्पादनावर अमेरिकेकडून आयात वस्तूंना कोणतीही सवलत लागू नाही. सोयाबीन, मक्का, तांदळासह साखर, बाजरी, ज्वारी रागी आणि इतर धान्यांवर कोणतीही सवलत अमेरिकेला देण्यात आलेली नाही असे पीयूष गोयल यांनी सांगितले.
काबुली चना, मूग, ग्रीन टी, मध,स्ट्रार्च, इथेनॉल, तंबाखू यासह केळी, स्ट्रॉबेरी, चेरी वा लिंबूवर्गीय फळांच्या आयतीवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. या सर्व उत्पादनांसह इतर कृषीजन्य उत्पादनावर अमेरिकन आयात वस्तू, उत्पादनाला कोणतीही शुल्कमाफी, सलवत या नवीन व्यापार करारामुळे मिळणार नसल्याचे आपण डंके की चोटपर दावा करत असल्याचे पीयूष गोयल यांनी जाहीर केलं.
