Crime News: बसमध्ये बोलण्यात गुंतवून तिघं महिलांनी लाखोंचे दागिने अन् रोकड लांबवली
Crime News: मालन गायकवाड यांना आपल्या जवळ दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली नाही. त्यामुळे त्या तीन महिलांनी पैसे गोळा करण्याच्या बहाण्याने बॅग चोरल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी त्यांचे पती विलास गायकवाड यांना हा प्रकार फोनवर सांगितला.

गावाकडे जमिनीचे खरेदीखत असल्याच्या कारणास्तव मुंबई ते खंडाळा असा बसने प्रवास करत गावी निघालेल्या महिलेला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर तिच्याकडे असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल १३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज तीन महिलांनी लंपास केला. या प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यात तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील संशयित एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय घडला प्रकार
मालन गायकवाड या खरेदी खतासाठी लागणारे पैसे देण्याकरिता गावी खंडाळा येथे निघाल्या होत्या. मुंबई-कराड बसने त्या जात होत्या. यावेळी त्यांच्याकडे रोख रक्कम आणि दागिने असलेली बॅग होती. त्यामध्ये मंगळसूत्र, राणीहार, नेकलेस, लक्ष्मीहार, अंगठी इत्यादी दागिने तसेच ६ लाख १० हजार रुपये रोख रक्कम होती. प्रवास करताना ही बस लोणावळा वाकड मार्गे नवले ब्रिज येथे आली. त्याठिकाणी बसमध्ये तीन महिला बसल्या. त्यातील एका महिलेकडे लहान मुल होते. या सर्व महिला मालन यांच्याजवळ बसल्या होत्या.
महिलांनी असे फसवले
बस नसरापूरजवळ आल्यावर एका महिलेने तुमच्या सिट खाली पैसे पडले आहेत, असे मालन गायकवाड यांना सांगितले. यानंतर या सर्व महिला त्यांच्यापाशी घोळका करत पैसे गोळा करण्यासाठी खाली वाकू लागल्या. तितक्यात एका महिलेने त्यांच्या जवळील पैसे आणि दागिन्यांची बॅग काढून घेतली. यानंतर लगेचच त्या महिला आम्हाला येथे उतरायचे आहे गाडी थांबवा असे म्हणू लागल्या. कंडक्टरने गाडी येथे थांबणार नाही, असे सांगितले असता त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यामुळे कंडक्टरने कापरहोळ (ता. भोर) जवळ बस थांबवून त्यांना उतरू दिले.




मालन गायकवाड यांना आपल्या जवळ दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली नाही. त्यामुळे त्या तीन महिलांनी पैसे गोळा करण्याच्या बहाण्याने बॅग चोरल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी त्यांचे पती विलास गायकवाड यांना हा प्रकार फोनवर सांगितला. त्यानंतर ते खंडाळा आले. मग मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये ते बसले. त्यावेळी बस चांदणी चौकात आली असता योगायोगाने त्या तिघं महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एका महिलेने मालन गायकवाड यांना बसमध्ये बसलेले पाहिले असता त्या पुन्हा बसमधून उतरू लागल्या. मालन यांनी त्या महिलेला ओळखले. त्यांनी लगेच आरडा ओरडा करत “हीच ती महिला आहे जिने माझी पैशाची व दागिने असलेली पिशवी चोरली आहे”, असे सांगितले. यांनतर उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवत त्यातील एका महिलेला पकडले. यावेळी तिच्या सोबतच्या इतर दोन महिला पळून जाण्यास यशस्वी ठरल्या.
शैलजा राजू भोगे (वय ३८ वर्ष, रा. औरंगाबाद, चिखल ठाणा) असे पकडलेल्या महिलेचे नाव असून बावधन पोलिसांनी तिला राजगड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.