नाईलाज होता, पुन्हा असं करणार नाही..; ‘आशिकी’ फेम राहुल रॉयची कबुली, नेमकं काय घडलं?
आशिकी फेम अभिनेता राहुल रॉयने त्याच्या व्हायरल रील्सवर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. राहुलचे काही रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये तो एका कंटेंट क्रिएटरसोबत दिसून येत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.

इन्स्टाग्रामवरील एका रीलमुळे प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर अखेर अभिनेता राहुल रॉयने स्पष्टीकरण दिलं आहे. एका कंटेट क्रिएटरसोबत राहुलने त्याच्याच गाण्यांवर रील शूट केला होता. हे रील जेव्हा संबंधित क्रिएटरने पोस्ट केले, तेव्हा त्यात राहुलला पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. राहुलने अशा प्रकारचे रील्स का केले, असा सवाल अनेकांनी केला. त्यानंतर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीचे रील्स करायची माझी अजिबात इच्छा नव्हती, हे त्याने कबूल केलं. माझा नाईलाज होता, हे राहुलने मान्य केलं आहे. त्याचप्रमाणे यापुढे असं काहीच करणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, “व्हायरल तर झालो नाही, परंतु माझा मजबुरी होती. आता पुन्हा असं काही करणार नाही. तुम्हा सर्वांना धन्यवाद.” राहुलने कमी शब्दांत प्रतिक्रिया दिली असली तरी त्यातून हे स्पष्ट होतंय की त्याने त्याच्या इच्छेविरोधात जाऊन हे रील्स शूट केले होते. अशा प्रकारच्या कंटेंटसाठी तो कम्फर्टेबल नव्हता, हेसुद्धा रीलमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय.
View this post on Instagram
हे रील्स पाहून एकीकडे काही नेटकरी राहुल रॉयला ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे काहींनी त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. 2020 मध्ये राहुलला त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेक स्ट्रोक आला होता. त्यातून बरं होण्यासाठी त्याला बराच वेळ लागला होता. ब्रेक स्ट्रोकवर मात करून पुन्हा कामावर परतणं खूपच आव्हानात्मक असल्याचा अनुभव त्याने एका मुलाखतीत सांगितला होता. थेरपी, शिस्त आणि सवयी यांच्या आधारे त्याने आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.
1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या चित्रपटातून राहुलला प्रचंड स्टारडम मिळालं होतं. या पहिल्यावहिल्या चित्रपटातून तो रातोरात स्टार बनला होता. परंतु पुढे त्याला हीच लोकप्रियता टिकवता आली नाही. हळूहळू त्याला चित्रपटांचे ऑफर्स मिळणे कमी झालं आणि तो इंडस्ट्रीपासून दुरावला गेला. राहुलने बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्येही भाग घेतला होता. या सिझनचा तो विजेता ठरला होता. त्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता.
